नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका? रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याला आग; खाजगी टिप्पर जळून खाक
कित्येक दिवस कचरा न उचलल्याचा आरोप; नागरिकांमध्ये संताप, नुकसानभरपाईची मागणी
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
केज शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. शहरातील धारूर रोड एचपी गॅस एजन्सी समोर रिकामी ठिकाणी रस्त्याच्या कडेला कित्येक दिवसांपासून कचरा साचून राहिल्याचा आरोप होत असताना, त्याच कचऱ्याला अचानक आग लागल्याने जवळ उभे असलेले हनुमंत इंगळे यांचे खाजगी टिप्पर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.हनुमंत इंगळे यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानी नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांवर आरोप केला आहे की कचरा हा नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी जाळला व त्यात माझा टिप्पर जळाले पण तक्रारीत अज्ञात इसमाने कचरा जाळला असे नोंद करण्यात आली आहे.तरी पोलीसांनी आजूबाजूचे सिसिटिव्ही तपासून गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. नगरपंचायतीकडून वेळेत कचरा उचलला गेला नसल्याने कचऱ्याचा ढीग वाढत गेला. दरम्यान, या कचऱ्याला आग लागली आणि आगीने भीषण रूप धारण करत जवळ उभ्या असलेल्या खाजगी टिप्पर कवेत घेतले. यात टिप्पर जळून खाक झाले आहे. ट
या घटनेनंतर नगरपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, “वेळेत कचरा उचलला असता तर ही घटना टळली असती का?” असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. नगरपंचायत प्रशासन शहरातील कचरा नियमितपणे उचलून विल्हेवाट लावत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कचरा साचून राहत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
घटनेची चौकशी करून आगीचे नेमके कारण शोधावे तसेच नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.
“कचरा वेळेत उचलला असता तर टिप्पर आज राख झाले नसते,” अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


