भुमाफिया कनेक्शनची चर्चा; केज तहसीलदार राकेश गिड्डे मृत्यू प्रकरणावर प्रश्नचिन्ह
घातपात की अपघात? एलसीबी चौकशीची मागणी; कुटुंबीयांकडून सखोल तपासाची हाक
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
केजचे तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूभोवती संशयाचे सावट गडद होत असून, हा अपघात की घातपात, याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघातानंतर त्यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब गायब असल्याची चर्चा समोर येत असल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
नऊ एप्रिल रोजी मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास केज-आंबेजोगाई मार्गावर चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या घटनेबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न समोर येत आहेत. अपघाताच्या रात्री गिड्डे हे त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर लातूरच्या दिशेने कशासाठी निघाले होते, दिवसभर त्यांच्या सोबत कोण होते, तसेच टोल नाक्यावर रात्री साडेआठच्या सुमारास वाहन दिसल्यानंतर पुढील दोन-अडीच तास ते कुठे होते, याबाबतही शंका व्यक्त होत आहे.
या प्रकरणात गिड्डे यांचे बंधू अक्षय गिड्डे यांनी चौकशीची मागणी केली असून, वडील अण्णासाहेब गिड्डे हे सुद्धा वाहनचालक असल्याने यांनीही अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केल्यानंतर काही संशयास्पद बाबी निदर्शनास आल्याचे सांगितले आहे. “घटना कशी घडली, याचे सत्य समोर यायला हवे. काही चुकीचे घडले असल्यास आम्हाला न्याय मिळावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, केज परिसरातील जमीन व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर काही संशयित घटकांचा तपासात समावेश करावा, अशीही चर्चा नागरिकांतून पुढे येत आआहे.वादग्रसत जमिनी संदर्भात तसेच वर्ग एक व वर्ग दोन जमिनींच्या अनेक फाईल्स गिड्डे यांच्या टेबलवर प्रलंबित होत्या. यामुळे ते काही काळ तणावाखाली असल्याचीही माहिती अनौपचारिक स्तरावर समोर येत आहे. याचबरोबर, गेल्या वर्षी त्यांच्या संदर्भात बोगस सहीचा मुद्दा देखील चर्चेत आला होता.
अपघातानंतर त्यांच्या काही जवळच्या व्यक्ती संपर्कात नसल्याची शंका काही माध्यमांतून व्यक्त करण्यात आली असून, याचाही तपास व्हावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर ‘भुमाफिया कनेक्शन’चाही तपास करावा, अशी मागणी दबक्या आवाजात जोर धरत आहे.
सध्या अधिकृतरीत्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले, तरी वाढत्या संशयामुळे या प्रकरणाचा तपास लातूर स्थानिक गुन्हे शाखेकडून (एलसीबी) सर्वंकष आणि निष्पक्ष पद्धतीने करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांसह कुटुंबीयांकडून होत आहे.
