पाच वर्षे सत्तेच्या सावलीत; आता सहा महिन्यांचे जनतेत मिसळण्याचे सोंग!
मिल बाँटके’च्या राजकारणाची चर्चा, आता जनतेसमोर हिशोब कोण देणार?
रोखठोक न्यूज केज
केज : केज नगरपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपत आली असून, १३ फेब्रुवारी २०२७ पर्यंत नगरपंचायतीच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा जनतेच्या दारात पोहोचण्याची तयारी करत असल्याचे चित्र आहे. मात्र, गेली पाच वर्षे नेमके कोण सत्तेत आणि कोण विरोधात होते, याचा हिशोब आता केजकरांनी मागण्याची वेळ आली आहे.
मागील पंचवार्षिकमध्ये जनविकास आघाडीचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ आणि काँग्रेसचे ३ नगरसेवक असे पक्षीय बलाबल होते. निवडणुकीनंतर काँग्रेस आणि जनविकासची युती होऊन सत्ता स्थापन झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर बसली. मात्र, त्यानंतरच्या पाच वर्षांच्या कारभारात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषाच जनतेला अनेकदा दिसली नाही, अशी चर्चा केजमध्ये रंगली आहे.
‘मिल बाँटके’च्या राजकारणाची चर्चा, आता जनतेसमोर हिशोब कोण देणार?
नगरपंचायतीच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित झाले, विविध विकासकामांबाबत आरोप-प्रत्यारोप झाले; मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची भूमिका कितपत प्रभावीपणे बजावली, हा प्रश्न आजही केजकरांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. पाच वर्षांच्या काळात जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याऐवजी सत्तेच्या राजकारणात सर्वच जण एकाच ताटात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली, अशी चर्चा आहे.
आता निवडणुका जवळ येताच पाच वर्षे सत्तेच्या पुढे हुजरेगिरी करणारे काही नगरसेवक अचानक जनतेत मिसळताना दिसतील, ‘आम्हीच जनतेचे तारणहार’ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतील, अशी टीका नागरिकांमधून होत आहे.
पण यावेळी केजकरांनी केवळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता प्रत्येक विद्यमान नगरसेवकाला एकच प्रश्न विचारण्याची गरज आहे
“पाच वर्षांत आमच्यासाठी नेमके काय केले?”
रस्ते, पाणी, स्वच्छता, नाल्या, आरोग्य, विकासकामे आणि नगरपंचायतीच्या कारभाराबाबत जनतेला काय मिळाले, याचा जाहीर हिशोब मागितला पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर होणारी दिखाऊ जनसंपर्क मोहीम आणि प्रत्यक्ष पाच वर्षांचा कामाचा अहवाल यातील फरक जनतेने ओळखला पाहिजे.
आता सोंग नाही, हिशोब हवा!
आगामी सहा महिन्यांत अनेक चेहरे पुन्हा गल्लीबोळात दिसतील. कुणी हात जोडेल, कुणी आश्वासनांची बरसात करेल, तर कुणी ‘आम्हीच विकास केला’ असा दावा करेल. मात्र, केजकरांनी यावेळी भावनिक आवाहनांना बळी न पडता पाच वर्षांचा लेखाजोखा मागावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
पाच वर्षे जनतेपासून दूर राहून निवडणूक जवळ आली की जनतेत मिसळण्याचे सोंग करणाऱ्यांना यावेळी जनता योग्य तो धडा शिकवेल का? याकडे संपूर्ण केजचे लक्ष लागले आहे.
आता वेळ आली आहे—चेहरे नव्हे, काम पाहण्याची; आश्वासने नव्हे, हिशोब मागण्याची!
