गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील आडस आणि परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदानाच्या मागणुलीसाठी शेकऱ्यांनीथील सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुसकर यांच्या नेतृत्वाखाली आडस ते केज अशी पायी दिंडी काढून तहसीलदारांना मागण्यांच्या निवेदनाचे गाठोडे सुपूर्त केले.
या बाबतची माहिती अशी की, आडस ता केज येथील शेतकऱ्यांनी बुधवारी दि. ११ सकाळी ८:०० वा. शेतकऱ्यांच्या पीक विमा अनुदानाचे वैयक्तिक तक्रार अर्जाचे गाठोडे डोक्यावर घेऊन बंडी आणि अर्धी चड्डी अशा अर्ध नग्न पेहरावात सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुस्कर यांच्या नेतृत्वाखाली आडस येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कळंबआंबा, चंदन सावरगाव, कुंबेफळ, ढाकेफळ मार्गे तहसील कार्यालय, केज असे २५ कि.मी. पायी जाऊन तहसील प्रशासनाला तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले. तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी त्यांचे निवेदन स्विकारले.
यावेळी रमेशराव आडसकर, भाई मोहन गुंड, शिवसेनचे रत्नाकर शिंदे, प्रा हनुमंत सौदागर, अरुण धपाटे, राम जोगदंड, बाळासाहेब ढोले, अंगद पाटील, संतोष मेहेत्रे, पत्रकार रामदास साबळे, सविता आकुसकर, शाम आकुसकर, शशिकांत इंगळे, अश्विनकुमार टोंपे, इब्राहिम पठाण, विष्णू थोरात यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
चौकट :-
————————————————-
लवकरच विमा कंपनी सोबत बैठक :- तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले की, पुढच्या आठवड्यात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यात शेतकऱ्यांनाचे प्रश्न व अडचणी सोडविण्या संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे.
———————————————-
ऑनलाइन आणि कागद-पत्रांच्या जमावा-जमवित शेतकरीवर्ग पिळला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. हे शासनाच्या व विमा कंपनीला कळावे म्हणून आम्ही पायी जाऊन निवेदन दिले.