धारूर तालुक्यातील शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआयचे छापे
रोखठोक न्युज वार्ताहर
धारूर तालुक्यात असलेल्या मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर रात्रीपासूनच ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या साखर कारखान्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
धारूर तालुक्यातल्या मुंगी गावच्या पांडुरंग सोळंके यांनी 2010 साली शिवपार्वती सहकारी साखर कारखान्याची उभारणी करायला सुरुवात केली. त्यात त्यांनी नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांना सोबत घेऊन एक “एमओयू” साइन केला. त्यानंतर काही काळ उलटला आणि नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी बनावट दस्तऐवज तयार करून हा कारखाना स्वतःच्या नावे करून पांडुरंग सोळुंके यांना बाजूला केलं.
त्यानंतर 2013 साली याच कारखान्याच्या नावावर तासगावकर कुटुंबीयांनी 106 कोटी रुपयांचं कर्ज पंजाब नॅशनल बँक आणि इतर दोन बँकांकडून घेतलं. बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च करून कारखान्याचे काम अर्धवट सोडलं आणि कारखाना दिवाळखोरीत काढला.
त्यांनतर हे प्रकरण कोर्टात गेलं. मात्र या कारखान्याचे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असतानाच, ज्या बँकेकडून कर्ज घेण्यात आल होतं त्या बँकांनी हा कारखाना लिलावात काढलाय. हा कारखाना लिलावात काढल्यानंतर आता यामध्ये ईडी आणि सीबीआय यांच्या अधिकाऱ्यांनी एन्ट्री केली आहे.
आता यामध्ये नेमकी सोळंके की तासगावकर यापैकी कोणाची चौकशी होत आहे? हे ईडी आणि सीबीआयच्या छाप्यानंतरचं उघड होणार आहे.