गाव फाट्यावर यायचं नाही, त्यांच्या दुकानात जायचं नाही
निवडणुकीतील जातीचे बीज,बहिष्कारा पंर्यत.काय करूण ठेवल बीड जिल्ह्य़ाच?
सलोख्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न हवेत
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड : गावच्या फाट्यावर यायचं नाही, त्यांच्या दुकानात जायचं नाही, गेलात तर दोन हजाराचा दंड, अशी शपथ घेत गावपातळीवर बैठक झाल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसह भविष्यकाळात जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टीने समाजधुरीणांना आणि प्रशासनाला एकत्र येऊन पावले उचलावी लागणार आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात विकासाच्या मुद्यापेक्षा जातीचा मुद्दा रंगला. जातीय एकजूट करीत मतांच्या ध्रुवीकरणाचा
डाव नेते, पुढाऱ्यांनी आखला. मते वळविण्याचा प्रयत्न झाला; परंतु निवडणुकीत जातीवादाची पसरलेली ठिणगी अद्याप शमलेली नसून त्याला हवा देण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून सुरू आहे. निवडणुकीत मतभेद असले पाहिजेत मात्र मनभेद असता कामा नये, अशी चर्चा नेहमी केली जात असलीतरी गावांमधून होणाऱ्या समाज समूहाच्या बैठका आणि घेतले जाणारे निर्णय भविष्यातील गाव परिसरातील सलोख्याची दरी निर्माण करणारे आहेत. ही दरी कमी करण्यासाठी नव्हे तर संपुष्टात आणण्यासाठी जिल्हाभरात ऑपरेशन मनोमिलनची गरज असून स्थानिक लोकप्रतिनिधींपासून तालुका, जिल्हा पातळीवरील लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागणार आहे.
