कोरोना काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
कोविड काळात काम केलेल्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्यमधील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. अशी कार्यपद्धती लवकरात लवकर निश्चित करावी जेणे करून भरतीच्या वेळी अशा कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ व्हावा तसेच सध्याच्या भरतीच्या पात्रतेच्या अधीन राहून ही कार्यपद्धती असावी असेही ठरले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. या निर्णयाचा राज्यातील हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.