(सोयाबीनच्या भिजलेल्या गंजीकडेपहात घेतला टोकाचा निर्णय)
____
केज ता.१५ (बातमीदार): सध्या तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले व काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीने हवालदील झाल्याल्या अल्पभुधारक शेतकऱ्याने शनिवार (ता.१५) रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राजेगाव येथे घडली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव संतोष अशोक दौंड (वय-४०) रा. राजेगाव असे आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने तालुक्यातील सर्वच भागाला झोडपून काढले आहे. त्यातच दोन दिवसात नांदुरघाट, विडा, हनुमंत पिंपरी, केज व होळी या महसूल मंडळात ढगफुटी सदृष्य अतिवृष्टी झाली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील काढणी केलेल्या व उभ्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीने हवालदील झालेल्या राजेगाव येथील संतोष दौंड या शेतकऱ्याला राजेगाव शिवारातील सर्वे नंबर १७ व ४८ मध्ये अडीच एकर शेती असून सध्या शेतात सोयाबीन व कापूस ही पिके आहेत. अतिवृष्टीने नुकसान झाल्यामुळे या शेतकऱ्याने लग्नाला आलेल्या मुलीचे लग्नाचे इतर मुलांच्या शिक्षणाचे काय होईल या नैराश्यातून शनिवारी सकाळी शेतात जाऊन झालेल्या नुकसानेकडे पाहून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळीच शेतातील सोयाबीनचे काढं वेचायला गेलेला संतोष अजून घरी न परतल्याने त्याला शोधत गेलेल्या कुटुंबियांना त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यावेळी कुटुंबियांनी फोडलेल्या टाहो पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच नांदूरघाट चौकीचे जमादार अभिमान भालेराव व पोलीस नाईक रशीद शेख यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह नांदुरघाट येथील ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. यावेळी संतोषने शेतातील नुकसान झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे. या शेतकऱ्याच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.