• Sat. Apr 18th, 2026

रासायनिक खतांच्या किमतींत पुन्हा वाढ; शेतकरी अडचणीत

Bybaba maske

May 6, 2024

रासायनिक खतांच्या किमतींत पुन्हा वाढ; शेतकरी अडचणीत

रोखठोक न्युज वार्ताहर 

आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे.शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर जवळपास अनिवार्यच झाला आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडत असल्याची स्थिती आहे.जिल्ह्यात खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. शिवाय बेसल डोस देणे आवश्यक असल्याने खताची आतापासूनच मागणी होत आहे. अशातच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

मिश्र खते, सुपर पोटॅशच्या भावातही मोठी वाढ झाली असून, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या आंतरमशागतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. ट्रॅक्टरने होणाऱ्या नांगरणीच्या खर्चात प्रति एकर ३०० रुपयांपर्यंत वाढ खोल नांगरणीचा खर्च दोन हजार रुपये प्रति एकरवर पोहोचला आहे.सोयाबीन काढणीचे दरही प्रति एकर ५ हजार झाले आहेत तर इतरही खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक कसरत करणारा ठरणार असुन या हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या भावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या खतांच्या भावातच वाढ होत असल्याने शेती आता आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.

खतांचे पूर्वीचे दर  खतांचे सध्याचे दर 

10.26.26 1470 रुपये 10.26.26 1700 रुपये

24.24.0 1550 रुपये 24.24.0 1700 रुपये 

20.20.0.13 1250 रुपये 20.20.0.13 1450 रुपये

सुपर फॉस्फेट 500 रुपये सुपर फॉस्फेट 600 रुपये 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या वाढत्या किमतीचा परिणाम आपल्या देशात दिसून येतो. युरिया साधारणपणे १५ ते २० टक्के, पोटॅश १०० टक्के, सुपर फॉस्फेट ६० ते ७० टक्के बाहेरील देशातून आयात केले जाते. 

मजुरीतही वाढ

एकीकडे खतांसह इतर कृषी निविष्ठांच्या किंमती गगनाला भिडत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहेच, शिवाय दरवर्षी मजुरीतही मोठी वाढ होत आहे. त्यात वेळेवर कामासाठी मजुरही मिळणे कठीण असल्याने शेती करावी की, नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!