पॅथॉलॉजी लॅबना लावणार चाप, कठोर कायदा करणार
मंत्री उदय सामंत यांची घोषणा, भरारी पथक करणार तपासणी
रोखठोक न्युज वार्ताहर
मुंबई: राज्य सरकार पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच कायदा करेल. या कायद्याचा मसुदा प्राप्त झाला असून त्यात शिक्षेची देखील तरतूद आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. आवश्यक प्रमाणपत्र न घेता कोणत्या लॅब सुरू आहेत का, याची तपासणी भरारी पथकामार्फत केली जाईल व बोगस डॉक्टरांच्या धर्तीवर या बोगस लॅबवरदेखील कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
मुंबईत बनावट पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याचा मुद्दा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून भाजपचे सुनील राणे यांनी उपस्थित केला होता. मुंबईतच नाही तर गावागावांत या लॅब उघडल्या गेल्या आहेत. मुंबई महापालिकेकडे २०१९ पासून अधिकृत लॅबची संख्याच नाही. हा तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे, असे राणे म्हणाले.
भरारी पथकाकडून तपासणी करणार
■ हा प्रश्न केवळ मुंबईपुरता नसून महाराष्ट्रभर व्याप्ती आहे. राज्य सरकार याबाबत एक कायदा बनवत आहे. त्यात शिक्षेची देखील तरतूद आहे.सर्टिफिकेट न घेता जर अशा लॅब असतील तर भरारी पथक पाठवून तपासणी केली जाईल. सर्टिफिकेट नसेल तर नोंदणी रद्द करण्यात येईल, असे मंत्री सामंत म्हणाले.
■ स्वतंत्र कायदा येऊ शकला नाही तर नर्सिंग अॅक्टमध्येही बदल करण्यात येईल, असेही मंत्री सामंत म्हणाले.
१० बाय १०च्या जागेत सॅम्पल कलेक्शन
आता तर पॅथॉलॉजी लॅबचे कलेक्शन सेंटर उभे राहिले आहेत. १० बाय १० च्या जागेमध्ये फक्त सॅम्पल घेतली जातात. सॅम्पल कलेक्शन सेंटरचा देखील कायद्यात अंतर्भाव करणार का, अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली. तर यावर कायदा येईल तेव्हा येईल; पण तोपर्यंत नर्सिंग अॅक्टनुसार देखील याबाबत कारवाई करता येऊ शकते, अशी सूचना राजेश टोपे यांनी केली.
• रुग्णालयांच्या बाजूला चणे मुरमुऱ्याच्या दुकानांप्रमाणे लॅब उघडल्या गेल्या आहेत. रुग्णालयातील कर्मचारीच या खासगी लॅबना सामील आहेत. या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. लॅबचे दर निश्चित करावे लागतील. एकच एमडी डॉक्टर पकडून सगळ्या लॅब सर्व रिपोर्टवर सह्या घेतात. अशा एमडी डॉक्टरांवर देखील बंधन आणावे, अशी मागणी उद्धवसेनेच्या अजय चौधरी यांनी केली.
