महिला वकिलाला सरपंचा कडून बेदम मारहाण.
रोखठोक न्युज वार्ताहर
बीडमध्ये महिला वकिलाला पाईप आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ध्वनिप्रदूषणाची तक्रार केल्याने मारहाण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला होता. त्यानंतर अनेक गुन्हेगारीच्या घटना या जिल्ह्यात घडल्या होत्या. अशातच आता अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे 36 वर्षीय महिला वकिलाला शेतामध्ये रिंगण करून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील 10 ते 12 जणांनी हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.
पोलीस ठाण्यात ध्वनिप्रदूषणाची तक्रार केल्याने मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या महिला वकिलाने गावातील ध्वनिप्रदूषणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. याचा राग आल्याने गावातील सरपंच आणि इतर व्यक्तींनी मारहाण ज्ञानेश्वरी यांना मारहाण केली आहे. आता या महिलेचे मारहाण केलेले फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. यामुळे संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश्वरी या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात. आता या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आरोपींवर कारवाई करण्याची मागणी
गावातील ध्वनिप्रदूषणाची तक्रार का केली असा जाब ज्ञानेश्वरी यांनी विचारण्यात आला होता. यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने सपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता या घटनेतील आरोपींवर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
