बीडच्या रेल्वेची पहिली मागणी कोणी केली होती?
१७ सप्टेंबरला रेल्वे धावणार.
रोखठोक न्यूज विशेष
बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या दोन पिढ्यांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर 17 सप्टेंबर 2025 रोजी पूर्णविराम मिळणार आहे. अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनानं एक ऐतिहासिक क्षण साकार होणार आहे. या रेल्वेचा ऑनलाइन शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे हे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
बीड जिल्ह्यातील नागरिकांनी रेल्वे सुरू होण्यासाठी गेल्या 75 वर्षांपासून संघर्ष केला. त्यांनी केलेलं आंदोलनं आणि संघर्षाला अखेर यश आलं आहे. या रेल्वेमार्गामुळे बीडचा सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकास गती घेणार आहे. रेल्वेच्या या संघर्षात आतापर्यंत 300 लोकांवर गुन्हा दाखल आहे. ते अजूनही कोर्टाच्या तारखांना हजेरी लावतात. ऐतिहासिक क्षणासाठी बीडकरांनी त्याग, संघर्ष आणि वेदना सोसल्या आहेत. त्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे.
बीडच्या रेल्वेत सर्वच लोकप्रतिनिधींचं योगदान : बीडच्या माजी खासदार स्वर्गीय केशरबाई क्षीरसागर यांनीदेखील या रेल्वेमार्गासाठी संसदेत प्रश्न मांडले होते. त्यानंतरच या प्रकल्पाला गती मिळाली.खासदार रजनीताई पाटील या खासदार असताना त्या वेळेस चे तत्कालीन रेल्वे मंत्री स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या हस्ते चंपावत मैदानावर रेल्वे चे उद्घाटन ३१ मे १९९७ ला केले होते त्यावेळेस व्यासपीठावर शंकरराव चव्हाण, गोपीनाथ मुंडे होते.रेल्वे कृती समितीचे नामदेव क्षिरसागर युवा रेल्वे कृती समीतीचे अमोल गलधर यांचे ही योगदान आहेच.पण रेल्वेच्या इतिहासात स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे योगदान विसरता येणार नाही त्यानी पहिल्यांदा महाराष्ट्र शासन यात रेल्वेचा अर्धा खर्च करेल असा जिआर काढला व तात्काळ महाराष्ट्राच्या हिश्याची रक्कम दिली.
युवा कृती समीतीचे अमोल गलधर यांनी युवका ना गोळा करून रेल्वे संदर्भात मोठे अंदोलन केले त्या वेळेस काही युवका सहित त्यांना अटक ही झाली. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी या प्रश्नावर निवडणूक लढवली त्यात आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड मध्ये सभा घेऊन पाच वर्षांत रेल्वे बीड मध्ये पाठवतो अशी वल्गना केली पण आज २०२५ उजाडले तरी रेल्वे काही परळी पंर्यत गेली नाही.
पुढील प्रत्येक निवडणुकीत बीडच्या रेल्वेचा मुद्दा प्रमुख बॅनरवर असायचा. त्यावर निवडणुका लढविल्या जायच्या. बीडची निवडणूक अनेक वर्षे रेल्वेच्या भोवतीच फिरत होती. यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले. खासदार प्रीतम मुंडे यांनीही अनेक वेळा रेल्वेमंत्र्यांना भेटून निधी उपलब्धतेसाठी विनंती केली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनीदेखील या रेल्वे प्रकल्पासाठी प्रयत्न केले आहे.त्यात आताचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विषेश प्रयत्न केले त्यानी अनेक वेळा रेल्वे मंत्री यांच्याशी भेट घेऊन वारंवार प्रयत्न केले.वेळोवेळी रेल्वे अधिकाऱ्यांच मिटींग घेऊन चर्चा केल्या व मर्यादित वेळेत बीड पर्यंत रेल्वे आणण्यात मदत केली व परळी प्रयत्न रेल्वे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, बीडमध्ये प्रत्यक्षात रेल्वे सुरू होण्यासाठी अनेकांना १७ सप्टेंबरची प्रतीक्षा आहे. नव्या पिढीला या रेल्वेमुळे भरपूर उद्योगधंदे आणि व्यवसायाची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दळणवळणाची सोय नसल्यानं बीडमध्ये उद्योगधंदे फारसे वाढले नव्हते. त्यामुळे लोक बाहेर जाऊन ऊस तोडणीचं काम करत होते. त्यांचे दोन-तीन पिढ्याही अशाच कामावर गुंतलेल्या होत्या. पण, रेल्वे सुरू झाल्यानं लोकांना छोटे-मोठे उद्योग सुरू करण्याची संधी मिळेल. रोजगार वाढून आर्थिक स्थिती सुधारेल, अशी आशा बीडकरांनी व्यक्त केली आहे.
