केज शहरा पासून पाच किलोमीटरवर १४ कोटींचा ‘‘दूरस्थ विकास’ — नागरिकांपासून पाच किमी दूर उभारला प्रकल्प; नेमका लाभ कुणाला?
केजच्या मुख्य वस्तीपासून तब्बल पाच किलोमीटर अंतरावर, अडगळीत आणि सुनसान ठिकाणी विकासकामे.
तब्बल १४ कोटी रूपय खर्च राजीव गांधी तळ्याच्या भवती कामे.
विकासा पेक्षा गुत्तेदाराचा विकासाला प्राधान्य?
रोखठोक न्यूज | विशेष प्रतिनिधी
केज शहराच्या मुख्य वस्तीपासून तब्बल पाच किलोमीटर अंतरावर, अडगळीत आणि सुनसान परिसरात असलेल्या राजीव गांधी तळे परिसरात तब्बल १४ कोटी रुपयांचा विकास प्रकल्प राबविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ज्या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, सार्वजनिक वाहतूक नाही, वीज-पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत, तिथे एवढा मोठा खर्च करण्यामागील नेमके नियोजन काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक भागांत रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि इतर मूलभूत कामे प्रलंबित असताना दूरवरच्या सुनसान भागात कोट्यवधींचा निधी वळवण्यात आला. हा विकास खरोखर जनतेसाठी आहे की केवळ कागदोपत्री आकडे वाढवण्यासाठी? अशी शंका व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, प्रथम त्या परिसरापर्यंत सुसज्ज रस्ता, प्रकाशयोजना, सुरक्षा व्यवस्था आणि नियमित वाहतुकीची सोय उभारणे गरजेचे होते. अन्यथा उभारण्यात येणाऱ्या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य नागरिकांना कसा मिळणार? “विकासा पेक्षा गुत्तेदाराचा विकास” प्राधान्याने होत असल्याचीही कुजबुज सुरू आहे.
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी सविस्तर आराखडा, अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि कामाचा दर्जा याबाबत सार्वजनिक माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. नागरिकांच्या कररुपी पैशांचा वापर पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने व्हावा, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका मांडून सर्व शंका दूर करणे आवश्यक आहे. अन्यथा पाच किलोमीटर दूर उभा राहिलेला हा ‘विकास’ प्रत्यक्षात जनतेपासून दुरावलेलाच राहील, अशी टीका जोर धरत आहे.
