उपोषणाचा तिसरा दिवस; तरीही प्रशासन निष्क्रिय — डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा अवमान प्रकरण तापले.
ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची मागणी प्रलंबित; केज तहसीलसमोर योगेश गायकवाड यांचे आमरण उपोषण सुरूच
रोखठोक न्यूज वार्ताहर | केज
केज तालुक्यातील उमरी येथील गंगामाऊली साखर कारखान्यात २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जाणीवपूर्वक डावलून ध्वजारोहण करण्यात आल्याचा आरोप समोर आल्यानंतर निर्माण झालेला वाद अधिक तीव्र झाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस उलटूनही प्रशासनाने गंभीर भूमिका घेतलेली नसल्याने संताप वाढत आहे.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष – युथ रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड यांनी केज तहसील कार्यालयात तहसीलदारांना सविस्तर निवेदन देत संबंधितांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी २७ जानेवारी २०२६ रोजी सहाय्यक निबंधक, केज यांच्याकडेही तक्रार सादर करण्यात आली होती.
योगेश गायकवाड यांच्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा लावणे आवश्यक असताना ती मुद्दाम लावण्यात आली नाही. याबाबत कारखान्याच्या संचालक व कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारखान्याचे कर्ते-धरते राहुल सोनवणे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेतुपुरस्सर किंवा गंभीर निष्काळजीपणातून बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा दावा करण्यात आला आहे.
हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असून संबंधितांवर तात्काळ ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या गंगामाऊली साखर कारखान्यावर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करून तो बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने योगेश गायकवाड यांचे केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून, उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली आहे.
या संवेदनशील प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास व्यापक लोकआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
