• Fri. Apr 24th, 2026

केज तालुक्यातील नांदूरघाट घरकुल घोटाळा उघड! गावात नसलेल्या बिहार-यूपी नागरिकांच्या नावावर लाखो रुपयांची उचल प्रत्येकी ₹१.२० लाख खात्यात जमा; ग्रामपंचायत बैठकीत प्रश्न विचारताच प्रशासनाची बोलती बंद — जबाब पंचायत समितीकडे ढकलला

Bybaba maske

Mar 1, 2026

केज तालुक्यातील नांदूरघाट घरकुल घोटाळा उघड! गावात नसलेल्या बिहार-यूपी नागरिकांच्या नावावर लाखो रुपयांची उचल

प्रत्येकी ₹१.२० लाख खात्यात जमा; ग्रामपंचायत बैठकीत प्रश्न विचारताच प्रशासनाची बोलती बंद — जबाब पंचायत समितीकडे ढकलला

रोखठोक न्यूज वार्ताहर | केज

केज तालुक्यातील नांदूरघाट येथे प्रधानमंत्री आवास योजनेत मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा संशय निर्माण झाला असून गावाशी कोणताही संबंध नसलेल्या परप्रांतीयांच्या नावावर लाखो रुपयांची रक्कम वळवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

२०२३ ते २०२४ या कालावधीत लाभार्थी यादीत बिहार व उत्तर प्रदेश राज्यातील काही व्यक्तींची नावे दिसून आली. मात्र संबंधित व्यक्ती गावात राहत नसून मतदारयादीतही त्यांचा मागमूस नसल्याने संपूर्ण योजनेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

धावज्याचीवाडी (ता. बीड) येथील कौशा बापुराव काटकर व अजय बापुराव काटकर हे नांदूरघाटचे रहिवासी नसतानाही त्यांना लाभ मंजूर झाल्याचे उघड झाले आहे.

याचबरोबर संतोष कृष्ण कुमार, पिंटू दुधनाथ बीन्स, रंजन देवनारायण कुमार, राहुल कुमार मनजीत, मानवन कुमार, पप्पू मुन्शी मियान, मोहम्मद दर्शद अन्सारी, छादादीप कुमार यांसह एकूण १० जणांच्या नावावर प्रत्येकी ₹१,२०,००० रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे — ही खाती नेमकी कोणी उघडली? पैसे कोणी काढले? खाते क्रमांक बदलून रक्कम वळवली का? — याबाबत प्रशासनाकडे कोणतेही स्पष्ट उत्तर नाही.

नांदूरघाट ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत एका सदस्याने हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करत ग्रामसेवक भगवान सिरसाट यांना जाब विचारला. मात्र त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवत संपूर्ण जबाब पंचायत समितीकडे ढकलल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना महिनाभरापूर्वी लेखी अर्ज देण्यात आला असूनही अद्याप कोणतीही माहिती न देण्यात आल्याने संशय अधिकच बळावला आहे.

गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून “गावात नसलेल्या लोकांच्या नावावर पैसे गेले तर खरे लाभार्थी कोण?” असा सवाल उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

रोखठोक न्यूजचा सवाल :

 घरकुल योजना गरीबांसाठी की बनावट खात्यांसाठी?

 प्रशासन मौन का?

 आणि या घोटाळ्यामागे नेमका ‘मास्टरमाईंड’ कोण?

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!