केजकर पाण्यासाठी हैराण; ऐन रमजानमध्ये १५ दिवसांपासून धनेगाव तलावाचा पुरवठा बंद
तलाव तुडुंब भरलेला तरी नळ कोरडे – ‘मोटार जळाली’चेच तेच उत्तर; नागरिकांचा संताप
आमदार नमिताताई मुंदडा तुम्ही तरी लक्ष घाला.
रोखठोक न्यूज वार्ताहर
केज शहरात गेल्या १५ दिवसांपासून धनेगाव तलावावरून होणारा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नळ कोरडे पडल्याने पाण्यासाठी नागरिकांची वनवण भटकंती सुरू असून शहरातील अनेक कूपनलिका (बोअरवेल) बंद असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. त्यामुळे केजकर अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असतानाच पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे धनेगाव येथील तलाव तुडुंब भरलेला असतानाही केजकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, ही परिस्थिती अधिकच संतापजनक ठरत आहे.
पाणीटंचाईबाबत नगरपंचायत प्रशासनाला जाब विचारला असता “धनेगाव तलावावरील पाणीपुरवठा करणारी मोटार जळाली” असेच ठरलेले उत्तर दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. १९९८ साली टाकलेली पाईपलाइन आणि जुनी मोटार किती दिवस टिकणार, हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर नवीन पाईपलाइन व पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाकडे ठोस पाठपुरावा करणे गरजेचे आहे, मात्र त्यासाठी सत्ताधाऱ्यांत तेवढी इच्छाशक्ती आणि धमक असावी लागते, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
या सर्व प्रश्नावर आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांनी लक्ष घालावे असे केजचे नागरिक चर्चा करत आहेत
दरम्यान, तलाव भरलेला असताना केजकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेचीच साक्ष असल्याची टीका आता शहरातून जोर धरत आहे.
