राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वत: आव्हाड यांनीच ही माहिती दिली असून जामीन देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हर हर महादेव चित्रपटाला राष्ट्रवादीचा विरोधा आहे. या चित्रपटाचा ठाण्याच्या सिनेमागृहात सुरु असलेला शो जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटाचा बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. या प्रकरणी आव्हाडांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पोलिसांनी ही अटक केली आहे.
आव्हाड यांनी म्हटले आहे, आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले.
मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं.
त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती.
ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.